सीताफळ लागवड, व्यवस्थापनाचे तंत्र

0

सीताफळ लागवड, व्यवस्थापनाचे तंत्र

कोरडवाहू भागातील हलक्या व उथळ जमिनीत पारंपरिक पिकाऐवजी फळझाडांची लागवड (Fruit Crop Cultivation) आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. सीताफळ (Custard Apple) हे हलक्या, मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे आणि अत्यल्प मशागतीत अधिक नफा मिळवून देणारे पीक आहे. या फळपिकाला उष्ण, कोरडे हवामान (Dry Weather) आणि मध्यम किंवा कमी हिवाळा मानवतो. साधारणपणे ३० ते ४० अंश सेल्सिअस तापमान आणि ५०० ते ६०० मि.मी. पर्जन्यमान (Rainfall) वाढीसाठी पोषक असते. फळधारणेवेळी ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेची गरज असते. फळे पिकताना उबदार व कोरडे हवामान असल्यास गोडी चांगली येते. हे अत्यंत काटक, मुळे खोलवर न जाणारे फळझाड असल्याने उथळ, हलक्या, मुरमाड डोंगर उताराच्या जमिनीत तग धरते. लागवडीसाठी हलकी ते मध्यम, चांगली निचरा होणारी दोन ते तीन टक्के उताराची, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन निवडावी.
जातींची निवड ः
महाराष्ट्रात लागवडीसाठी (ॲनोना स्क्वॅमोसा) या प्रकारातील फुले पुरंदर, बाळानगर, अर्का सहान, एपीके -१, अनोना हायब्रीड – २, धारुर-६, लाल सीताफळ, ताड पिंपळगाव-७ (टीपी – ७), फुले जानकी या जाती उपलब्ध आहेत.
अभिवद्धी :
१) बियांपासून अभिवृद्धी :
बियांपासून लागवड केलेली झाडे एक सारख्या गुणधर्माची नसतात. फळांची गुणवत्ता, उत्पादन एकसारखे नसते. त्यामध्ये प्रत्येक झाडांची फळांची गुणवत्ता, उत्पादनात फरक होतो.
शाखीय पद्धतीने अभिवृद्धी :
१) शाखीय पद्धतीने अभिवृद्धी केल्यास फळे एकाच गुणधर्माची, चांगली गुणवत्ता असणारी मिळतात. सर्व झाडांचे उत्पादन एकसारखे असते. त्यामुळे बियांपेक्षा कलम पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करणे फायद्याचे ठरते.
२) सीताफळांमध्ये डोळे भरून किंवा मृद्‍काष्टकलम पद्धतीने कलम करतात. कलम करण्यासाठी स्थानिक सीताफळाच्या खुंटाचा वापर करता येतो. एक वर्ष वयाच्या खुंटावर जानेवारी महिन्यात मृद्‍काष्ट कलम केल्यास कलमे जगण्याचे प्रमाण चांगले मिळते.
लागवडीचे तंत्र :
१) लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून, कुळवून घ्यावी. हलक्या व मुरमाड जमिनीत ४ × ४ मीटर आणि मध्यम जमिनीत ५ × ५ मीटर अंतरावर ४५ × ४५ × ४५ सेंमी आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात लागवडीपूर्वी शेणखत १ ते १.५ घमेले, पोयटा माती २ ते ३ घमेले, १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरावेत.
२) पाऊस पडल्यानंतर खड्ड्यामध्ये कलमे किंवा रोपे लावावीत. खत, माती मिश्रमाने भरलेल्या खड्यामध्ये रोपे, कलमे लागवताना मध्यभागी लहान खड्डा करून लावावीत. माती हाताने दाबून, काठीचा आधार देऊन, सुतळीने सैल बांधावीत. पाऊस नसेल तर लगेचच झारीने पाणी द्यावे.
आंतरपिकांचे नियोजन ः
१) लागवडीनंतर दोन-तीन वर्षे खरीप हंगामात तूर, चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, ताग, धैंचा यांसारखी आंतरपिके घ्यावीत.
२) आंतरपिकांमुळे जमिनीचा कस कायम राहून जमीन संपूर्ण झाकली जाऊन तणांचे नियंत्रण होते.

पाणी व्यवस्थापन
१) सीताफळ हे कोरडवाहू फळझाड असल्याने गरजेइतकेच पाणी द्यावे. लागवडीनंतर ३ ते ४ वर्षे झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी द्यावे.
२) पूर्ण वाढलेल्या झाडास साधारपणे ५० ते ६० लिटर पाणी पुरेसे होते. पाण्याची गरज झाडांचे अंतर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते. सीताफळास सूक्ष्म फळनिर्मिती, फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून-जुलै ते सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाण्याची गरज असते.
३) सुरुवातीच्या काळात बागेस हलक्या जमिनीत ५ ते ६ दिवसांनी, मध्यम जमिनीत ८ ते १० दिवसांनी आणि भारी जमिनीत १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.
४) ठिबक सिंचनाचा वापर करुन कमी पाण्यामध्ये सीताफळाचे अधिक उत्पादन घेता येते. पारंपारिक सिंचन पद्धतीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास झाडापर्यंत पाटातून वाया जाणारे ६० ते ७० टक्के पाणी वाचवता येते. खते पाण्यात मिसळून देता येत असल्याने खतांच्या मात्रेत २५ ते ३० टक्के बचत होते. पाणी आणि खते मुळांच्या परिसरात दिली जातात, खते निचऱ्याद्वारे किंवा स्थिरीकरणामुळे वाया जात नाहीत. त्याचबरोबर जमिनीच्या चढ- उतारावरसुद्धा नियंत्रित पद्धतीने सारख्या प्रमाणात पाणी देता येते.
वळण देण्याची पद्धत ः
१) लागवड केल्यानंतर झाडास योग्य आकार येण्यासाठी तसेच फांद्या जमिनीला टेकू न देण्यासाठी मुख्य खोडावर येणारे फुटवे जमिनीपासून एक मीटरपर्यंत वरचेवर काढाव्यात. त्याच्यावर चारही दिशांना फांद्या विखुरलेल्या राहतील असे वळण द्यावे.
२) ज्या ठिकाणी फांद्याची गर्दी आहे, आडव्या फांद्या आहेत अशा फांद्या काढव्यात. अशाप्रकारे झाडांना वळण दिल्यास बागेत झाडांवर भरपूर सूर्यप्रकाश पडून हवा खेळती राहते. त्यामुळे झाडांची वाढ, फुले लागण्याचे प्रमाण वाढून फळधारणा चांगली होऊन चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते.
बहर व्यवस्थापन :
१) फळांच्या अधिक उत्पादनाकरिता बहराचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असते. जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो. परंतु पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळाच्या सुरुवातीस बहर धरता येतो.
२) उन्हाळी बहराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्याने बाजारभाव चांगला मिळून अधिक आर्थिक नफा मिळतो.
खत व्यवस्थापन
१) पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडास बहर धरताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे. संपूर्ण स्फुरद, पालाश आणि नत्राची अर्धी मात्रा खोडापासून दूर फांद्याच्या परिघाखाली रिंग करून द्यावी.
२) खते झाकून पहिले पाणी द्यावे. उरलेल्या अर्ध्या नत्राची मात्रा एक महिन्याच्या अंतराने द्यावी.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »