जमिनीची धूप होणे म्हणजे काय? भाग १

0

भाग १ – जमिनीची धूप होणे म्हणजे काय?

भूपृष्ठावरील मातीचे एका जागेवरुन दुस-या जागेवर स्थलांतर म्हणजेच जमिनिची धूप होय. प्राणी व वनस्पती यांची हालचाल तसेच पर्जन्य यांचे परिणाम यामुळे भूपृष्ठावरील मातीचे कण एकमेकांपासून विलग होतात. असे हे विलग झालेले कण वारा व जमिनीवरुन पावसाचे वाहणारे पाणी यांच्या बरोबर वाहून नेले जाते व अशा प्रकारे जमिनीची धूप होते.


धूपेची प्रक्रिया ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. खडकांपासून ऊन, पाऊस, वारा, थंडी, उष्णता इत्यादी च्या परिणामामुळे विदारण प्रक्रियेने माती तयार होत असते. ही विदारण प्रक्रिया अत्यंत संथ गतीने होत असते. 1 से.मी. जाडीचा मातीचा थर तयार होण्यास अनेक वर्षे लागतात. तसेच दाट झाडे झुडपे यांचेपासून पडणारा पाला पाचोळा साठून कुजून त्यापासूनही माती तयार होते. वारा, पाऊस इत्यादीमुळे ही माती एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी वाहून नेली जाते. सखल भागातील माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जावून दुस-या ठिकाणी गाळाच्या स्वरुपात साठते व तेथे उपयुक्त जमीन तयार होते. तर उंच, उताराच्या व दाट वनश्रीच्या भागातील पाला पाचोळा या सखल भागात येवून साठतो व त्यापासून माती तयार होवून झालेली धूप भरुन निघते. अशा प्रकारे जोपर्यन्त विदारण व धूप या दोन्ही प्रक्रियांचा समतोल साधला जातो तो पर्यन्त त्या एकमेकास पूरक असतात. यास नैसर्गिक धूप म्हणतात व अशी नैसर्गिक धूप ही उपकारक असते.


परंतु मनुष्य व अन्य प्राणी यांचा वावर जमिनीवर वाढल्याचे मातीचे कण मोठया प्रमाणावर विलग होतात. तसेच शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची मशागत केल्याने मातीची उपथापालथ होवून ती विस्कळीत होते. त्याचप्रमाणे चुकीच्या मशागतीच्या पध्दतीमुळे जमिनीवर पडणा-या पावसाच्या व जमिनीवरुन वाहणा-या पाण्याला अनिर्बंध मार्ग तयार करुन दिला जातो, व त्यामुळे वाहणा-या पाण्याची गती वाढून त्यातून उर्जा निर्माण होते. अशा प्रकारे नैसर्गिकरित्या होणा-या धूपेला गतिवृध्दीत धूप असे म्हणतात. या प्रकारची धूप ही अपायकारक असते. त्यामुळे तिचा प्रतिबंध आपणास करावयास पाहिजे.


धुपीचे प्रकार :-


खालीलप्रमाणे धूपीचे प्रकार आहेत. त्यांना धूपीचे प्रकार म्हणण्यापेक्षा अतिवृध्दीत धूपेचे टप्पे म्हणणे उचित ठरेल. कारण एका प्रकारामधून दुस-या प्रकाराचा उगम होत असतो.


उसळी धूप (स्प्लॅश इरोजन)


पावसाचे पाणी जमिनीवर जेव्हा पडते, तेव्हा फार उंचीवरुन पडत असते. पावसाच्या प्रत्येक थेंबास अत्यंत कमी का होईना वजन असते व इतक्या उंचावर ते असल्याने त्या प्रत्येक थेंबाची विशिष्ट स्थळ उर्जा असते. पावसाचे थेंब जमिनीवर पडत असताना ते जमिनीच्या पृष्ठभागावर आघात करतात. या आघातामुळे पृष्ठभागावरील मातीचे कण विलग होवून बाजूला पडतात. अशाप्रकारे गतिवृध्दीत धुपेला प्रारंभ होतो.


 


ओघळी धूप (रिल इरोजन) :-


पावसाचे थेंब जमिनीवर पडल्यानंतर उताराच्या दिशेने वाहू लागतात. त्याबरोबरच ते त्याच्या आघाताने विलग झालेले मातीचे कण वाहून नेतात. वाहत असताना असे अनेक थेंब एकत्र येवून त्यांचा लहानसा प्रवाह तयार होतो. जमिनीच्या उतारामुळे या प्रवाहास गती मिळून ती सतत वाढत जाते व त्यामुळे भूपृष्ठाची आणखी झीज होऊन या लहान लहान प्रवाहाच्या जागी लहान ओघळ तयार होतात. हा धूपेचा दुसरा टप्पा झाला.


चादरी धूप (शीट इरोजन) :-


अशाप्रकारे पडलेल्या लहान लहान ओघळी एकत्र येवून त्यांचा मोठा पाणलोट तयार होतो, यास अपधाव (रन ऑफ) म्हणतात. हे अपधाव पाणी भूपृष्ठावरुन एखाद्या चादरीप्रमाणे वाढत जाते व पुन्हा त्यास जमिनीच्या उतारामुळे गती प्राप्त होवून जमिनीच्या मोठया पृष्ठभागाची झीज होऊन ती माती या पाणलोटाबरोबर वाहत जाते.


घळी धूप (गली इरोजन) :-


भूप्ठावरुन वाहणारा पाणलोट प्रवाहात परिवर्तित होण्यासाठी मार्ग शोधू लागतो व खोलगट भागात तो केंद्रित होवून लागतो. अशाप्रकारे घळीचे शीर्ष (गली हेड) तयार होते. नंतर हे पाणी खोलगट भागाकडे वाहू लागते व प्रवाह तयार होतो. त्यास आजूबाजूच्या अन्य उंच भागावरील पाणलोट येवून मिळत असतात व प्रवाह विस्तारत जातो. वाढत्या पाणलोटामुळे व जमिनीच्या उतारामुळे या प्रवाहाची गती वाढून प्रवाहाच्या तळाची आणखी धूप होत जाते व त्या ठिकाणी घळ तयार होते.


प्रवाहातील धूप (स्ट्रीम बॅक इरोजन):-


पाण्याचा प्रवाह वाहत असताना त्यात पाणलोट क्षेत्राबरोबर सतत वाढ होत जाते व त्याच्या तळाच्या उतारामुळे त्याची गती देखील वाढत जाते. या वाढत्या गतीमुळे प्रवाहाच्या तळाची तसेच त्याच्या दोन्ही काठाची आणखी झीज होत जाते, व प्रवाहाची खोली व विस्तार दोन्ही वाढत जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »