कलिंगड/टरबूज व खरबूज

0


कलिंगड व खरबूज
ही दोन पिके महाराष्ट्रामध्ये घेतली जातात. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. खरबुजाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुगंध असतो. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे व अ, ब, क  जीवनसत्वे काही प्रमाणात असतात.

जमीन व हवामान
कलिंगड पिकासाठी मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन योग्य असते. या पिकांकरिता जमिनीचा सामू ५.५ ते ७ योग्य असतो. दोन्ही पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. वेलींची वाढ होण्याकरिता २४ अंश सेल्सिअस ते २७ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. तापमान कमी अधिक वाढ झाल्यास म्हणजेच १८  अंश सेल्सिअस च्या खाली व ३२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेलींच्या वाढीवर व  फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. २१ अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान असल्यास बियांची उगवण होत नाही.

लागवड हंगाम
जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात या पिकांची लागवड केली जाते.

बियाणाचे प्रमाण
खरबूजासाठी हेक्टरी १.५ ते २ किलो बियाणे व कलिंगडासाठी हेक्टरी २.५ ते ३ किलो बियाणे पुरेसे असते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास ३ ग्रॅम थायरम चोळावे.

पूर्वमशागत
शेतास उभी आडवी नांगरणी करून ढेकळे फोडून काढावी व एक वखरणी द्यावी. शेतात चांगले कुजलेले १५ ते २० गाड्या शेणखत टाकावे, नंतर वखरणी करावी.

लागवड
कलिंगड व खरबूजाची लागवड बिया टोकून करतात कारण त्यांची रोपे स्थलांतर सहन करू शकत नाहीत. या पिकांची लागवड खालील प्रकारे केली जाते.

आळे पद्धत – ठराविक अंतरावर आळेकरून त्यात शेणखत मिसळून मध्यभागी ३-४ बिया टोचाव्यात.

सरी वरंबा पद्धत – 2 X ०.५ मीटर अंतरावर कलिंगडासाठी तर खरबूजासाठी १ X ०.५ मीटर अंतरावर ३ ते ४ बिया टोचून लावाव्यात

रुंद गादी वाफ्यावर लागवड – या पद्धतीत लागवड रुंद गादीवाफ्याच्या दोन्ही बाजूंना करतात. त्यामुळे वेल गादी वाफ्यावर पसरतो व फळे पाण्याच्या संपर्कात येत नाही त्यामुळे फळे खराब होत नाहीत. यासाठी ३ ते ४ मी. अंतरावर सरी पाडून सरीच्या बगलेत दोन्ही बाजूंना १ ते १.५ मी. अंतरावर ३ ते ४ बिया टोचाव्यात.


खते व पाणी व्यवस्थापन
कलिंगड व टरबूज या दोन्ही पिकांसाठी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश लागवडी पुर्व द्यावा व लागवडी नंतर १ महिन्यांनी ५० किलो नत्राचा दुसरा हफ्ता द्यावा. जमिनीच्या पोतीनुसार पिकास पाणी द्यावे वेलीच्या वाढीच्या काळात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने व फळधारणा होऊन फळ वाढू लागल्यावर ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळी हंगामात कलिंगडाला साधारणपणे १५-१७ पाळ्या द्याव्या लागतात.

आंतरमशागत
या दोन्ही पिकांची बी उगवून वेल पूर्ण वाढीला लागे पर्यंत आजूबाजूचे सर्व तण काढून शेत  भुसभुशीत ठेवावे. शेतातील मोठे तण हातानी उपटून टाकावे. भारी जमिनीत बी पेरल्या नंतर पाणी देऊ नये. कारण अशा जमिनीत पाणी सुकल्यानंतर वरचा थर कडक होतो.

कलिंगड

अर्का ज्योती
– ही संकरित जात असून फळ मध्यम ते मोठ्या आकाराचे फिकट हिरव्या रंगाचे व गडद हिरवे पट्टे असलेले असून गडद गुलाबी व गोड असते. ही जात साठवणूकीस व वाहतुकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन ८०० क्विंटल मिळते.

अर्का माणिक – या जातीच्या फळांचा आकार अंडाकृती, साल पातळ हिरव्या रंगाची असून गडद हिरवे पट्टे असतात. फळाचे वजन ६ किलो पर्यंत असते. हेक्टरी उत्पादन ६०० क्विंटल मिळते.

आशियाई यामाटो – ही जपानी जात असून मध्यम अवधीत तयारे होते. फळांचे सरासरी वजन ७ ते ८ किलो असते. फळ फिकट रंगचे व गडद पट्टे असलेले असते. गर गडद गुलाबी व गोड असतो.

शुगर बेबी – ही जात महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. फळ मध्यम आकाराचे ४ ते ५ किलोचे असून फळाचा रंग कळपात हिरवा असून गर लाल अत्यंत गोड असून बिया लहान असतात.

न्यू हँम्प शायर – ही जात फळांची लवकर येणारी जात अंडाकृती असून साल पातळ हिरव्या रंगाची व त्यावर हिरवे पट्टे असणारी असून गर गडद लाल व गोड असतो.

या शिवाय  दुर्गापुर केसर, अर्का माणिक, पुसा बेदाणा  या जाती लागवडीस योग्य आहेत.

टरबूज

पुसा शरबती
– या जातीच्या फळांचा आकार गोल, किंचित लांबट, साल खडबडीत जाळी युक्त आणि मधून मधून हिरवे पट्टे, गर नारंगी रंगाचा व जाड असतो.

हरा मधु –  ही जात उशिरा येणारी असून फळांचा आकार गोल असतो. फळाची वरची साल पांढरी असून त्यावर खोलगट हिरवे पट्टे असतात. गर फिकट व हिरव्या रंगाचा गोड असतो.

अर्का राजहंस –  ही लवकर येणारी जात असून फळ मध्यम ते मोठे १ ते १.५ किलोचे असते. साल मळकट पांढरे असते. फळ गोड असून साठवणुकीस उत्तम असते. हेक्टरी उत्पादन ३२० क्विंटल मिळते.

दुर्गापूर मधु –  मध्यम अवधित तयार होणारी जात असून फळे लांबट लहान असून साल फिक्कट हिरव्या रंगाची असते व त्यावर हिरव्या रंगाच्या धरी असतात. गर फिक्कट हिरव्या रंगाचा गोड असतो.

अर्का जीत – ही लवकर येणारी जात असून फळांचे वजन ४०० ते ८०० ग्रॅम असते. फळे आकाराने गोल,  आकर्षक व पिवळ्या रंगाचे असते.

या शिवाय लखनऊ, सफेदा,  खारीधारी,  फैजाबादी  इत्यादी स्थानिक जाती लागवडीस योग्य आहेत.

रोग व कीड
रोग


भुरी
– या रोगाची सुरवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पृष्ठभागावर वाढते त्यामुळे पाने पांढरी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.

उपाय – डीनोकॅप किंवा कार्बेन्डँझिम हे औषध ९० लिटर पाण्यात १० ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारावे. नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फवारावे. नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फवारणी करावी.

केवडा – पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार होतो.

उपाय – डायथेन झेड – ७८ ०.२% तीव्रतेची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येईल.

मर – हा बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात. व कालांतराने मरतात.

उपाय – हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपुर्व १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे.

कीड

फळमाशी
– या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते. त्यामुळे ळी फळातील गर खाते त्यामुळे फळे सडतात.

उपाय – कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. पिकावर व जमिनीवर मेँलाँथीऑन या औषधाचा १ टक्का तीव्रतेचा फवारा मारावा.

तांबडे भुंगे – बी उगवून अंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्या रंगाचे भुंगेरे उपजीविका करतात.

मावा – हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडून गळून पडतात.

उपाय – किड दिसल्यास मँलाँथीआँन हे औषध ०.१ टक्का या प्रमाणात फवारावे.

काढणी व उत्पादन
कलिंगड व खरबूज काढणी फळ पुर्ण पिकल्यावर करतात. नदीच्या पात्रातील फळे बगयातीपेक्षा थोडी लवकर तयार होतात. बी पेरल्यापासून ३ ते ३.५ महिन्यात काढणी सुरु होते व ३ ते ४ आवड्यात पुर्ण होते. आकार व रंगावरून फळांची पक्वता ठरविणे कठीण आहे. फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालील प्रमाणे आहेत.

कलिंगडात देठाजवळ काळी (टेन्दरील) सुकली की ते तयार झाले असे समजावे.
तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास ‘बद’ असा आवाज येतो. मात्र कच्चे असल्यास धातूच्या वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो.
कलिंगडाचा जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागाचा रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे .
तयार फळावर हाताने दाब दिल्यास कर्रर्र असा फळातून आवाज येतो.
फळ तयार असल्यास देठाजवळ लव अजिबात दिसत नाही. देठ अगदी गुळगुळीत दिसतो.
कलिंगडाचे व खरबुजाचे अनुक्रमे हेक्टरी उत्पादन २५० ते ३०० क्विंटल आणि१०० ते १५० क्विंटल येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »