थंडीपासून करा द्राक्षबागेचा बचाव

0
थंडीपासून करा द्राक्षबागेचा बचाव
Date:
31 डिसेंबर 2017 –
——–———–———–
आजवरच्या अनुभवानुसार अति थंडीमुळे द्राक्ष पिकाचे २०-८० टक्के नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी द्राक्ष पिकाची अति थंडीच्या कालावधीत योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक असते.
 
हवामानातील तापमान हा महत्त्वाचा घटक असून, द्राक्ष या पिकासाठी १५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान योग्य असते; परंतु तापमान यापेक्षा खाली आल्यास त्याचा द्राक्ष बागेवर वाढीच्या अवस्थेनुसार विपरीत परिणाम होतो.
– तापमान १० अंश सेल्सिअस एवढे असल्यास, द्राक्ष वेलीची कार्यशक्ती कमी होते.
– तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी झाल्यास (अति थंडीमध्ये) द्राक्ष वेलींची पाने सुकतात व करपल्यासारखी दिसतात. द्राक्ष वेलीची पाने करपल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेवर विपरीत परिणाम होतो. परिणामी वेलींची, घडांची वाढ मंदावते. फळांचे वजन कमी होते. साखर- आम्ल प्रमाण कमी होते. फळांचा टिकाऊपणा कमी होतो. 
थंडीपासून बचावासाठी –
अ) पूर्वदक्षतेचे उपाय –
द्राक्ष बागेच्या भोवती पश्चिम व दक्षिण दिशेला वारा प्रतिबंधक झाडांची लागवड करावी. (उदा. बांबू, तुती, शेवगा, हादरा, पांगरा, शेवरी इ.) यामुळे अति थंडीपासून द्राक्ष बागेचा बचाव करता येतो. 
ब) नियंत्रणाचे उपाय –
१. विहिरीच्या पाण्याने ओलित करणे –
अति थंडीच्या कालावधीत द्राक्ष बागेत रात्री विहिरीच्या पाण्याने ओलित करावे. विहिरीच्या पाण्याचे तापमान कालव्याच्या पाण्यापेक्षा जास्त असते, त्यामुळे द्राक्ष बागेतील तापमान वाढण्यास मदत होते. विहिरीचे पाणी उपलब्ध नसेल तर पाटाचे पाणी रात्रीच्या वेळी द्यावे. 
२. बोदावर आच्छादन करणे –
द्राक्ष बागेमध्ये पूर्ण जमिनीवर आच्छादन करणे शक्य होत नाही. त्यामुळे वेलीच्या ओळीमधील ३-४ फुटांच्या पट्ट्यांमध्ये बोदावर आच्छादन करावे. आच्छादनासाठी काडी-कचरा, गवत, तणीस, भाताचे तूस इ. पदार्थ वापरावेत. आच्छादनाची जाडी २-१० इंच असावी.
– आच्छादनासाठी वापरण्यात येणाऱ्या पदार्थांचे कुजण्याचे कार्य सुरू असते, त्यामुळे ऊर्जेत वाढ होते. अशा प्रकारे मुळांच्या सान्निध्यातील तापमान कमी-जास्त होत नाही. परिणामी द्राक्षवेलीची मुळे कार्यशील राहतात. मण्यांच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम न होता मण्यांची वाढ सुरू राहते.
– आच्छादनामुळे तणांची वाढ थांबते. उपलब्ध पाणी व अन्नद्रव्यांसाठी वेलीस तणांशी स्पर्धा करावी लागत नाही. उपलब्ध अन्नद्रव्यांचा अधिक कार्यक्षमतेने वापर होतो.
– बाष्पीभवनाद्वारे होणारा पाण्याचा व्यय कमी होतो. जमिनीतील ओलावा टिकून राहतो. वेलींची वाढ व उत्पादनामध्ये अनुकूलता दिसून येते. आच्छादन कुजून पिकाला अन्नघटक उपलब्ध होतात. वेलीचे पोषण चांगले होते. 
३. बागेत धूर करणे –
रात्रीच्या वेळेस द्राक्ष बागेत ओलसर पाला-पाचोळा पेटवून धूर करावा. त्यामुळे तापमानात वाढ होण्यास मदत होते. 
४. अमिनो ॲसिड फॉर्म्युलेशनची फवारणी करणे –
अति थंडीमुळे पाने करपतात. पानांची कार्यक्षमता कमी होते. ती वाढविण्यासाठी अमिनो ॲसिड असलेले फॉर्म्युलेशन फवारावेत. त्यामुळे पानांची कार्यक्षमता वाढते, शर्करेचे वहन सुरू होते, तसेच शर्करेचे अन्य घटकांत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढतो. 
५. वेलीस पाण्याचा ताण पडू देऊ नये –
द्राक्ष बागेतील जमिनीत पाण्याचे योग्य प्रमाण ठेवावे, त्यामुळे तापमान नियंत्रित राहते. परिणामी पांढऱ्या मुळीची वाढ सुरू राहते. अन्नद्रव्ये वर उचलली जाऊन घडाचा विकास होण्यास मदत होते. पाण्याचा संतुलित वापर करावा. वेलीला पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाण्याबरोबर अथवा ठिबक सिंचनाच्या साह्याने मॅग्नेशिअम सल्फेटचा शिफारशीप्रमाणे वापर करावा. 
६. ४०० ग्रॅम द्राक्ष घडाच्या पोषणासाठी साधारणपणे १५-१६ पाने आवश्यक असतात. या प्रमाणात घड कमी करावेत. उर्वरित घडांचे योग्य पोषण होण्यास मदत होते. 
७. घडांच्या सांगाड्याचा कडकपणा कमी करण्यासाठी कॅल्शियम नायट्रेट युक्त खतांची फवारणी करावी. 
८. पिंक बेरी नियंत्रण –
द्राक्ष मण्यात पाणी उतरण्याच्या अवस्थेत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि किमान तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास घड गुलाबी पडतात, असे तापमान दीर्घकाळ राहिल्यास सर्वच द्राक्ष घड गुलाबी दिसतात. 
उपाय –
१. द्राक्ष वेलींची ऑक्टोबर छाटणी वेळेत करावी.
२. वेलीस पोटॅश या अन्नद्रव्ये शिफारशीत प्रमाणात द्यावीत.
३. द्राक्ष मण्यात पाणी उतरण्यास सुरवात झाल्यास वेलीवर प्लॅस्टिक / शेडनेटचे आच्छादन करावे. द्राक्ष घड पेपरने झाकावेत.
४. सायटोकायनीन संजीवकाची शिफारशीत मात्रा पाणी उतरण्याच्या वेळी द्यावी. त्यामुळे द्राक्ष मण्यात हरितद्रव्ये टिकून राहतील. 
– डॉ. भारत गरड, ०२४२६- २४३३४४
(उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.) 
  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »