अशी होती शेती “शेती करा – औद्योगिकरण व शहरीकरण थांबवा”

0

अशी होती शेती


*”शेती करा – औद्योगिकरण व शहरीकरण थांबवा”*

        
भारतीयांनी दहा हजार वर्षे उत्कृष्ट शेती केली. येथील निसर्गाच्या जडणघडणीला धरून शेतकऱ्यांनी अन्नाची सुलभता, विपुलता व विविधता निर्माण केली. 
ब्रिटिशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकविण्यासाठी तेथील सुवर्णपदक विजेते रासायनिक शेती तज्ञ डॉ. सर अल्बर्ट हॉवर्ड यांना सन १८९५ मधे भारतात पाठवले. हॉवर्ड हे कोपर्निकस, ब्रुनो व गॅलिलिओ या शास्त्रज्ञांच्या परंपरेतले खरे शास्त्रज्ञ होते. त्यांना भारतीयांच्या शेती विषयी कुतूहल होते. त्यांनी ठरवले की, प्रथम भारतात फिरून हा कृषिप्रधान देश हजारो वर्षे शेती कशी करतो ते पाहू. ते पाच वर्षे भारतात विविध ठिकाणी फिरून शेती समजून घेत होते. 
ते त्यांच्या “आँन अँग्रिकल्चरल टेस्टामेंट ” या ग्रंथात म्हणतात, “भारतीय शेतकरी माझे गुरू आहेत. त्यांच्या कडून मी शिकलो की निसर्ग हा खरा शेतकरी आहे. एकाच खाचरात जमिनीचा कस वाढता ठेवून हजारो वर्षे शेती करणे भारतीयांकडून शिकावे. ते मिश्र व फिरती पिके घेतात. या पध्दतीची जाण आम्हा ब्रिटिशांना १९ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत सन १८८९ पर्यंत नव्हती.” 
हॉवर्ड पुढे लिहितात “रसायन हे खत नसून विष आहे, ते पिकांचे अन्न नाही.” हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे. आजही तो शेती विषयक प्रमाणभूत मानला जातो. हॉवर्ड यांचे भाकीत की “यंत्राची भूक पृथ्वी भागवू शकणार नाही ” हे आज खरे ठरले आहे. 
ब्रिटिश राजवट येईपर्यंत भारतात ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी’, अशी स्थिती होती. मात्र ब्रिटन व इतर युरोपियनांची साम्राज्ये ही मूलतः वेगळ्या बैठकीवर आधारीत होती. ती बैठक होती यंत्राची. यंत्रामुळे होणाऱ्या लाखो करोडो वस्तुंच्या उत्पादनामुळे तंत्रज्ञानाची. या अमर्याद वस्तु उत्पादनाला ग्राहक हवा, बाजारपेठ हवी होती. यामुळे व्यापार मुख्य झाला. भारतात राज्य करणारी ‘ईस्ट इंडिया’ ही कंपनी होती. या व्यापारावर उभारलेल्या साम्राज्याला, बाजारपेठ म्हणजे शहरे निर्माण होणे हवे होते. परंतु भारतीय शेती हा त्यातील मुख्य अडथळा होता. शाश्वत अन्न देऊ शकणारी तिची क्षमता, तिने निर्माण केलेली समाधानावर साधेपणावर व शहाणपणावर आधारलेली जीवनपध्दती हा अर्थव्यवस्थेसाठी अडथळा होता. कारण या देशात उत्पादक शेतकरी हाच उपभोक्ता होता. तो स्वावलंबी होता ही औद्योगिकरण व शहरीकरणासाठी समस्या होती. अशा स्थितीत बाजार निर्माण होत नाही. 
म्हणून मोठ्या पगाराचे आमिष देणाऱ्या नोकऱ्या ब्रिटिशांनी तयार केल्या. शेतकरी व शेती मोडली जाईल अशी धोरणे राबवली. कसेही करुन शेती सोडून शहरांकडे स्थलांतर करण्यास शेतीत सामावलेल्यांना भाग पाडले. त्यातून उत्तम व्यापार, मध्यम नोकरी व कनिष्ठ शेती अशी नवी व्यवस्था निर्माण झाली. 
डॉ. अल्बर्ट हॉवर्ड यांनी वनस्पती व प्राणी यांच्या कुजण्यातून ‘ह्युमस’ निर्मितीतून अनेक पिकांबाबत शेती उत्पादनात काही पट वाढ करून दाखवली होती. त्यांचा वरील ग्रंथ सन १९४० मधे प्रथम लंडन मधे प्रकाशित झाला होता. सन १९५६ पर्यंत त्याच्या सात आवृत्त्याही निघाल्या होत्या. त्यांनी यंत्र व रसायनांचा शेतीत प्रवेश करण्यातील धोका दाखवला असूनही स्वतंत्र भारतात स्वामिनाथन सारख्या कुठलीही प्रतिभा नसलेल्या, कंपन्यांच्या शेतीतील हितसंबंधाचा पुरस्कार करणाऱ्या, स्वतः शेती न करणाऱ्या सुमार माणसाच्या नावाचे वलय निर्माण केले गेले. भारतीय शेतकऱ्यांचे व शेतीचे वाटोळे करण्याचे ब्रिटिशांना न जमलेले काम या स्वामीनाथनांनी करून दाखवले. करोडो भारतीयांना विषारी अन्नाव्दारे कॅन्सर, हृदयविकार व इतर व्याधी देऊन यमसदनाला पाठविण्याचे महापाप यांनी केले. ‘स्वामिनाथन’ हे स्वत: जणू एक औद्योगिक, कृत्रिम उत्पादन आहेत. ही भारतीयांत रूजलेली पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारी एक दांभिक प्रवृत्ती आहे. 
भारतीयांना कायमचे गुलाम बनवण्याचे मेकॉलेचे उद्दीष्ट यामुळे पूर्ण झाले. भारतात ब्रिटिशांना हवी तशी माणसे शिक्षणाने घडवली व स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिश अंमल अशाप्रकारे चालू राहिला. 
गांधीजी म्हणत की, ‘मेकॉलेच्या शिक्षणाने भारतीयांच्या गुलामगिरीचा पाया घातला.’ 
युध्दात स्फोंटकांच्या 
निर्मितीसाठी रसायने बनवणाऱ्या कारखान्यांना युध्दानंतर काम नसे व या रसायनांचे करायचे काय? हा प्रश्न होता. ती रसायने शेतीत खत म्हणून आणली गेली. यातून एनकेपी (नायट्रोजन, पोटॅशियम,फॉस्फोरस ) खतांचा भडीमार झाला. हे औद्योगिकरणासाठी शेतीला वापरणे होते. रासायनिक खतांना गंधकाम्लाचा (सल्फ्युरिक अॅसिड) पाया असतो. त्यामुळे जमिनीतील जिवाणू, गांडुळे मृत झाली. रासायनिक खतांच्या वापरास मूळ पिके प्रतिसाद देईना. ती खाली पडू लागली. म्हणून, पृथ्वीवरील जैविक विविधतेचा भाग म्हणून अस्तित्वात असलेल्या, परंतु काड व पानांचा अभाव म्हणून वापरात नसलेल्या, मेक्सिकोतील गहू व थायलंडमधील तांदळाच्या मूळ बुटक्या वाणांचा संकर करून गहू व तांदळाच्या नव्या खुज्या जाती आणल्या.
 यामुळे बियाणांची स्वयंपूर्णता नष्ट झाली. शेतकरी पूर्वी बियाणे विकत नव्हता ते फक्त दिले घेतले जात होते. बियाण्यांना व एकूणच शेतीला पावित्र्य होते. जमीन काळी आई होती. गायीगुरे घरच्या माणसांप्रमाणे होती. निसर्ग, ईश्वर हे देतोय ही जाणीव होती. स्वामीनाथन नव्हे तर कंपनी पुरस्कृत, हरित क्रांती, या फसव्या नावाच्या शेतीमुळे शेती संस्कृती मोडली. औद्योगिकरणामुळे सर्व गोष्टींचे वस्तुकरण करण्याची वृत्ती शेतकऱ्यांत आली. यामुळे काही काळ, काही शेतकऱ्यांना सुबत्ता आल्याचे दिसले. पण या प्रक्रियेत खरा शेतकरी मेला. तथाकथित हरित क्रांती ने हजारो वर्षे नसलेला घटक म्हणजे उत्पादन खर्चाला जन्म दिला.
 आधी सर्व कार्य निसर्ग करत होता. पाऊस तो पाडत होता बियाणे तोच देत होता. पावसाळ्यातील टिकलेल्या ओलाव्यावर व दवावर रब्बीची पिके येत होती. फक्त श्रमाची गरज होती. गाई, गुरे गोमूत्र व शेणखत इ. देत होती. दूध देत होती. गुर चरणात चरत होती. कोंबड्या होत्या, बकऱ्या होत्या. शेतांभोवतीच्या जंगलात मध, फळे, कंदमूळे इत्यादी विनाशुल्क उपलब्ध होती. उन्हाळ्यात भोपळा, कलिंगड व इतर वेली वाढत होत्या. पावसात खेकडे व इतर खाद्य मिळत होते. झरे, नद्या वाहत होत्या. विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या होत्या. खाड्या, सागरात विपुल मत्स्यसृष्टी होती. हवा शुध्द होती. हे असे हजारो वर्षे होते. याला औद्योगिकरणाची, शहरीकरणाची, अर्थव्यवस्थेची, विकासाची दृष्ट लागली.
गांधीजी म्हणत की, “भारतातील प्रत्येक शेत ही एक प्रयोगशाळा आहे व प्रत्येक शेतकरी हा शास्त्रज्ञ.” आता जमीन माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा निघाल्या आहेत. व वेळो वेळी माती परीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीची मानसिकता यासाठी घडवली जाते. हे जणू आईची परिक्षा घेण्यासारखे आहे. ज्या मातीने करोडो वर्षे सृष्टी प्रसवली तिची सृजनक्षमता तपासायची यांना गरजच काय? माती निर्जीवच मुळी यांच्या तंत्रज्ञानाच्या लादण्यामुळे झाली. जंगलाला कुणी खत देत नाही. पाणी देत नाही. नांगरणी करत नाही. तरीही जंगल करोडो वर्षे आहे. आजही जंगलाकडून बोध घेतला तर या आपत्तीतुन सुटका होऊ शकते.
 शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची गरज नाही. मात्र मग पैशा मागे धावणे देखील थांबले पाहिजे. असा पैशा मागे धावणारा समाज असलेली शहरे ही चूक आहे हे समजून घेतले पाहिजे. विदर्भासारख्या फक्त ४०० ते ६०० मि.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रातही घनदाट जंगल होते. ही जंगलाची क्षमता गळणाऱ्या पानांच्या, वनस्पतींच्या व प्राणी- पक्ष्यांच्या अवशेषांच्या व उत्सर्जनाच्या जमिनीवर सतत निर्माण होणाऱ्या थरामुळे, आच्छादनामुळे आहे. त्याचे विघटन करून पचवणाऱ्या जिवाणू व गांडुळांमुळे आहे. त्यांनी झाडांना पुरवलेल्या पोषक द्रव्यांमुळे आहे. जमीन सच्छिद्र केल्यामुळे पाणी व हवा खेळल्यामुळे, निचरा करण्यामुळे आहे. 
या नव्या संकरित जाती व रासायनिक खतांमुळे तात्कालिक वाढलेल्या उत्पादनाचे गाजर शेतकऱ्यांना दाखवले गेले. परंतु याचे दुष्परिणाम नंतर समजणार होते.५० वर्षांपूर्वी याचे व्यसन लावण्यासाठी बियाणे व खते फुकट दिली गेली. 
संकरित बियांणामधे किडीला तोंड देण्याची क्षमता नव्हती. शिवाय तणे जास्त उंच ठरू लागली. मग किटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके बनवणाऱ्या कंपन्या वाढीस लागल्या. तण, कीटक, बुरशीने रसायनांना तोंड देण्याची क्षमता वाढवली की, अधिकाधिक विषारी रसायने शेतात ओतण्यात आली. एक दुष्टचक्र सुरू झाले. 
पाराशर ऋषींनी २००० वर्षांपूर्वी म्हटले की, ‘जंतुनाम् जीवनम् कृषि:’. कृषि हे सजीवांच्या, जीव जिवाणुंच्या जगण्याचे रूप आहे. हे जीवाणू व गांडूळे जमिनीत सच्छिद्रता ठेवत होते. हवा खेळवत होते. मूळांना प्राणवायू देत होते. पाण्याचा निचरा करत होते. मुख्य म्हणजे वरील थरात पडणारा पालापाचोळा व इतर सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यांना वनस्पतींना योग्य अशा अन्नात बदल घडवत होते. हा जीव – जिवाणू गांडूळांचा दुवा हरित क्रांतीने नष्ट झाला. 
रासायनिक खतांना तिप्पट वा चौपट पाणी लागत होते. त्यामुळे नद्या अडवणारी धरणे बांधली गेली. तरीही पाणी कमी म्हणून बोअरवेल खणल्या गेल्या. भूजलाचा उपसा वाढत गेला. रसायनांमुळे सर्वच कीटक नष्ट होत गेले. विषारी रसायने शिरलेल्या अळ्यांना खाऊन पक्षी मेले. जमिनीतील सच्छिद्रता संपल्याने ती टणक झाली. मग ट्रॅक्टर वापरले जाऊ लागले. गाई – गुरे निरूपयोगी ठरू लागली. त्यांच्या शेणाची,खताची व नांगरणीची गरज संपली असे मानले गेले. बुटक्या वाणांमुळे काड, पाने कमी झाली. त्याचा चारा, जमिनीत खत होणे, जळण म्हणून उपयोग होणे थांबले.
जंगलांची क्षमता सर्वात वरच्या पालापाचोळा व अवशेषांच्या कुजत असलेल्या मातीच्या थराने बाष्पीभवन थांबवण्यामधे आहे. निसर्गाचे चक्राकार संतुलन राखण्यात आहे. जैविक नियंत्रणात आहे. स्वतःचे थंड वातावरण निर्माण करण्यात आहे. अधिक गुंतागुंतीच्या तरीही सुनियोजित विलक्षण अद्भूत कार्यपध्दतीमधे आहे. त्याचे आकलन अबोध सजीवांना व आदीम जमातींना आहे. म्हणून वादळे, पाऊस, भूकंप, सुनामी इत्यादींचा मागोवा त्यांना आधी लागतो. परंतु स्वतःला बुध्दीवान म्हणवणाऱ्या शिक्षित मानवाला याचे ज्ञान नाही. माणसाने या आधुनिक बनण्याच्या चुकीच्या प्रक्रियेत अनेक नैसर्गिक क्षमता गमावल्या आहेत. 
आपण फक्त दहा ते बारा हजार वर्षापूर्वी जंगल सोडले आणि अगदीच थोड्या म्हणजे सुमारे ५० ते २५० वर्षांत जंगल आपणास जगवते हे भानही सोडले. जीवनाच्या ३९० कोटी वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात हा नगण्य काळ आहे. वस्तुंचे जग निर्माण करून औद्योगिकरणाने, आपले अस्तित्व ज्याचा भाग आहे व ज्यावर अवलंबुन आहे, त्या खऱ्या नैसर्गिक जगाशी उभा दावा मांडला. हे मानवजातीने स्वतःला नष्ट करून घेणे आहे.
भारतात फक्त १०० वर्षांपूर्वी भाताच्या २ लाख जाती होत्या. अनेक प्रांतांत तर खाचरागणिक वेगळी जात होती. ही निसर्गाची व त्याचा आदर करणार्‍या कल्पक भारतीय शेतकऱ्यांची किमया होती. शेतकरी हजारो वर्षे भुकेसाठी अन्न पिकवत होते. जसे की ते इतर प्राणिमात्रांसाठी असते. मात्र हरित क्रांतीने बाजारासाठी धान्य पिकवण्याची कल्पना रुजवली. त्यातुन दुप्पट, तिप्पट उत्पादनाद्वारे मोठे उत्पन्न मिळवण्याची इच्छा आली. पूर्वी अन्न उत्पादन हा हेतू होता. आता पैशांचे उत्पन्न हा हेतू बनला. हे हवा व पाण्याप्रमाणे असलेली अन्न ही मुलभूत गरज भागवण्यासाठी नव्हते. उलट असा शहरी समाज वाढवला जात आहे जो हवा, पाणी व अन्न एव्हढ्याच इतर प्राणिमात्रांप्रमाणे आपल्या गरजा आहेत हे विसरून गेला आहे. त्या सहज भागत असल्याने कृत्रिमरीत्या उद्योगातून बनलेल्या असंख्य वस्तु चलनाद्वारे मिळविण्याच्या मागे लागला आहे. त्याला आधुनिक जीवनशैली असे गोंडस नाव दिले आहे. हा उदरनिर्वाह नाही. कार, टीव्ही, संगणक, मोबाईल, इ. वस्तुनिर्वाह आहे. मात्र यांना जगवणारा मूलभूत गरज असलेले अन्न पिकवणारे शेतकरी मात्र यांच्या एखाद्या महिन्याच्या पगारापेक्षाही कमी रकमेचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या करू लागले. अशी विषम बेगडी व्यवस्था बदलण्याचा तो प्रयत्न करत नाही. समाजदेखील ही खोटी , अन्यायकारक, अशाश्वत व्यवस्था बंद करू असे म्हणत नाही. कर्जमाफी, खत, वीज, पाणी, बियाणे घरे इ. फुकट किंवा सवलतीच्या दरात मिळविण्यासाठी मागण्या होत आहेत. मरत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तर हवीच, परंतु खते, वीज, पाणी, बियाणी कशाला? यामुळे तो पुन्हा औद्योगिकरणाने निर्माण केलेल्या सापळ्यात अडकतो. यापूर्वी हजारो वर्षांत त्याने अशा मागण्या त्यावेळचे सत्ताधारी राजाकडे केल्या नव्हत्या. तो स्वावलंबी, स्वतंत्र होता. तोच राजा होता. त्याच्या गावांच्या स्वयंपूर्णतेमुळे भारतात स्वराज्य होतेच.
धन्यवाद🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »