पावसाचे नैसर्गिक संकेत

0

पावसाचे नैसर्गिक संकेत…

१) पावसाळ्याच्या सुरुवातीस पूर्व अगर पश्चिम दिशेस आकाशात सौम्य मेघगर्जना होत असताना चातक, बेडूक, मोर तसेच पावश्या पक्षाचे आवाज ऎकू येऊ लागले म्हणजे त्यावर्षी चांगला पाऊस पडेल असे समजावे.

२) सकाळच्या वेळी जर घोरपडी बिळाबाहेर येऊन तोंड काढून बसलेल्या दिसल्या तर एक दोन दिवसात पाऊस येणार असे समजावे.

३) मुंग्यांच्या सतत धावणाऱ्या रांगा विरळ झाल्या, दिसेनाश्या झाल्याकी, मृगाचा पाऊस चारपाच दिवसात पडणार असे समजावे.

४) सरडयांच्या डोक्यांचा रंग तांबडा झाला की, आठवडाभरात पाऊस येणार असे समजावे.

५) पंख असलेल्या ऊदयांचे थवे वारुळातून अगर मातीच्या भिंतीतून संध्याकाळी बाहेर पडताना आणि घराभोवती ऊडताना दिसले कि, मृग नक्षत्राचा पाऊस चार दिवसांवर आला आहे असे समजावे.

६) सूर्योदय व सुर्यास्ताच्यावेळी क्षितिजावर काळ्याभोर ढगावर तांबूस छटा दिसल्या आणि काळ्या ढगांच्या कडावर रुपेरी चमक दिसली की, पाऊस जवळ आलाअसे समजावे.

७) कावळ्यांच्या काटक्या, धागे जमवून घरटी बांधण्याची धांदल सुरु केली की, पंधरवडयात पावसास सुरुवात होणार असे समजावे.

८) रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्रात पश्चिम क्षितिजावर ढग गर्जना न करता गुरगुराट करताना आढळले की ,हंगामभर उत्तम पाऊस पडणार असे समजावे.

९) हस्त नक्षत्रातील लोह चरणीतील जमीन कठीण करतो व पिकाच्या मुळामध्ये अपायकारक रोग निर्माण करतो.

१०) कृतिका व रोहिणी नक्षत्रात कमळाची फुले असलेल्या तळ्यात अगर सरोवरात वघ्य पक्षात रात्री नक्षत्रे व तारे यांचे सुस्पष्ट प्रतिबिंब दिसले तर मृग ते चित्रा या सर्व नक्षत्रात चांगला पाऊस संभवतो.

११) स्वाती नक्षत्रातील पाऊस खळ्यातील धान्याचा नाश करतो तर समुद्रावर पडणारा पाऊस मोती निर्माण करतो असे म्हणतात.

१२) पूर्व दिशेकडून सरकत येणाऱ्या ढगांनी आकाश व्यापून पर्जन्यवृष्टी झाल्यास धान्याची समृद्धी होते. आग्रेयकडून ढग जमा झाल्यास ते वांझ असल्याने पाऊस पडत नाही. दक्षिणेकडून कार्तिक व मार्गशीष महिन्यातील शुक्ल पक्षात ढग येऊन थोडी जरी वृष्टी झाली तरीही धान्याची नासाडी होते . नैॠतेकडून फळीधरून येणाऱ्या  ढगांची वृष्टी कृमी, किटक तसेच वनस्पतीचे रोग वाढविते. याऊलट पश्चिम, उत्तर व ईशान्य या दिशांनी येणारे ढग व त्यामुळे होणारा पाऊस सुबत्ता आणतो असे जाणकार सांगतात.

१३) रात्रीच्या वेळी झाडाझुडपांवर अनेक काजवे चमकताना दिसले की , चारपाच दिवसात पाऊस पाडणार असे समजावे.

१४) जेष्ट महिन्याच्या अमावस्येपासून ते आषाढी एकादशीपर्यंत कोकिळेचा आवाज ऐकू आला नाही तर सर्वत्र चांगला पाऊस होतो. मात्र कोकिळेचा आवाज अगर गुंजन बंद झाले नाही तर अवर्षणाची शक्यता संभावते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »