मजुर तुपाशी शेतकरी उपाशी
पाटोदा दि.१८ वार्ताहर(महेश शेटे) :सध्या जवळजवळ सर्वच शेतीमालाचे भाव अर्ध्याहून अधिक कमी झाले असले तरी मजुरीचे दर मात्र तेच आहेत. त्यामुळे मजूर तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे.
लाल कांदा मार्केटमध्ये विक्रीला येताच कांद्याचे दर गगनाला भीडले होते. चार ते पाच हजार रुपये क्विंटल कांदा जात असल्यामुळे मजुरीचे दर दीड पटीने वाढले होते. पाच हजार रुपये एकर लागवड खर्च चालू असताना अचानक भाव वाढल्यामुळे कुठे सात हजार तर कुठे आठ हजार रुपये एकर कांदा लागवड भाव देण्यात आला होता. परंतु सध्या कांद्याचे भाव अर्ध्या पेक्षाही कमी झाले, तरी मजुरीचा दर मात्र कायम आहे. सध्या कांद्याची विक्री सरासरी 1000 रुपये क्विंटलने होत असली, तरी कांदे काढण्याचा एकरी दर मात्र नऊ हजार रुपये आहे. कांदे काढण्याचे आणि लावण्याचे काम करणाऱ्या मजुरांना दिवसाकाठी सहा ते सात तास काम करून पाचशे ते सहाशे रुपये रोज सहज मिळतो. परंतु शेतकऱ्याच्या नशिबी मात्र तोट्याची गणितं येत आहेत. परंतु शेतकर्यांना धड काढायला आलेला कांदा सोडून देणे शक्य नाही, आणि वाढीव मजुरी देऊन काम करून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे शेतकऱ्याची इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.