शेळयांचे आजार व रोग प्रतिबंधात्मक उपाययोजना..

0

शेळी पालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व तसेच शेळयांचे आरोग्य सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आरोग्य व्यवस्थापनात निष्काळजीपणा दाखविल्यास कळपातील जनावरांना विविध रोगाची लागण होऊन शेळयांच्या मृत्युमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा वेळी ताबडतोब पशुवैद्याकडून कळपातील आजारी शेळयांचे उपचार करून घेणे फायदेशीर ठरते. तसेच शेळीपालकांना साथीच्या रोगांची लक्षणे उपचार व प्रतीबंधक उपाय माहिती असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येईल व मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते.

कळप निरोगी ठेऊन शेतक-यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी रोगाच्या प्राथमिक अवस्थेतच आजारी शेळया ओळखणे अतिशय महत्वाचे आहे.

आजारी शेळी कशी ओळखावी :

• हालचाल भुक मंदावते.

• आजारी शेळ्या कळपातुन वेगळ्या राहण्याचा प्रयत्न करतात.

• लेडयांचे प्रमाण कमी होऊन त्या घट्ट किंवा पातळ होतात.

• लघवी कमी व पिवळसर असते.

• नाकपुड्या कोरडया पडतात.

• एखादयावेळी शेळी लंगडते.

• अंगावरील केस ताठ होऊन चमक नाहीशी होते.

• दुध उत्पादन कमी होते.

शेळयांना जिवाणूजन्य, विषाणूजन्य तसेच परजिविमुळे होणारे आजार प्रामुख्याने दिसून येतात.

जीवाणुजन्य आजार

आंत्रविषार :-

हा रोग क्लॉस्ट्रीडिअम परफ्रिजेस टाइप डी या जीवाणुपासून होतो. या रोगाला अतिखादय आजार असेही म्हटले जाते.

रोगाची कारणे :- हे जीवाणु मातीमध्ये व निरोगी जनावरांच्या आतडयामध्ये वास्तव्य करतात. हा रोग पावसाळयात जास्त प्रमाणात दिसून येतो. कारण उन्हाळयात शेळयांची उपासमार झालेली असते आणि पावसाळयात जेव्हा कोवळे गवत जास्त प्रमाणात दिसून येते तेंव्हा हे गवत भरपुर खाल्ल्यामुळे पोट गच्च् भरून पोटात थोडी ही जागा शिल्लक राहत नाही. त्यामुळे पोटातील वातारण ऑक्सिजन विरहित होऊन हे जिवाणु वाढतात व विष तयार होते. तयार झालेले विष आतडयाद्वारे शोषले जाऊन शेळ्यांना विषबाधा होते व शेळया मृत्युमुखी पडतात. तसेच लहान करडांना जास्त् प्रमाणात दुध पाजणे अति कार्बनयुक्त् पदार्थ जसे मका, गहू, ज्वारी इ. जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास या रोगांची लक्षणे आढळून येतात.

रोगांची लक्षणे :-
• हा अल्पमुदतीचा आजार असून या रोगाची लक्षणे खुप कमी कालावधीतच दिसतात.

• लहान करडे/कोकरांमध्ये लागण झाल्यापासून २ ते १२ तासात मृत्यु येतो.

• संध्याकाळी शेळया, करडे चरून आल्यानंतर त्यांना चक्कर आल्यासारखे दिसते, आणि त्या गोल फिरून पडतात व पाय झाडत प्राण सोडतात.

• बाधित पिल्लांना पातळ हिरव्या रंगाची हगवण होते.

• दिर्घकाल पण कमी प्रमाणात विषबाधा झाल्यास शेळयांमध्ये आणि करडांमध्ये हगवण आढळून येते.

•मेलेल्या शेळीचे शवविच्छेदन केल्यास शेळींची / करडांची आतडी रक्ताळलेली किंवा लालसर दिसतात.मुत्रपिंड थोडेस मोठे व लाल झालेले आढळते.

उपचार :- या रोगाची लक्षणे किंवा विषबाधा झाल्यावर उपचारचा फारसा फायदा होत नाही. तरीही पशुवैद्यकांच्या सल्ल्याप्रमाणे प्रतिजैविके द्यावीत त्यामुळे पोटातील विष शोषणाचे प्रमाण कमी होते व जिवाणूंची वाढ होणे थांबते.

• शेळयांना आणि करडांना नविन आलेले ताजे गवत, पाला जास्त प्रमाणात खाऊ घालू नये. लहान करडांना गरजेपेक्षा जास्त दुध पाजू नये. अतिकर्षयुक्त पदार्थ (ज्वारी, मका इ) जास्त प्रमाणात खाऊ घालू नये.

• पावसाळयापुर्वी शेळयांना रोग प्रतिबंधक लसीकरण करावे. पहिल्या मात्रेनंतर १५ दिवसांनी दुसरी मात्रा देणे आवश्यक आहे. तसेच गाभण शेळयांना प्रसुतीपुर्वी तीन ते चार आठवडे आंत्रविषार रोगाचे लसिकरण करून घ्यावे. शेळीच्या चिकापासून या रोगाविरुदधची प्रतिकारशक्ती करडाला मिळते आणि त्यामुळे करडू जन्मल्यानंतर तीन आठवडे आंत्रविषार या रोगाला बळी पडत नाहीत. तसेच करडांना २१ दिवसानंतर आंत्रविषार लस टोचावी व पुन्हा १५ दिवसांनी दुसरी मात्रा द्यावी.

घटसर्प :-

घटसर्प हा रोग सर्व ऋतुमध्ये होतो, पण पावसाळयात याचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा रोग पाश्धुरेला या जिवाणुमुळे होतो. हा रोग श्वसनसंस्था तसेच आतडयांशी संबंधीत आहे. हा रोग सर्व वयोगटाच्या शेळया/मेंढयामध्ये दिसून येतो.

रोगप्रसार :-

या रोगाचा प्रसार मुख्यत्वे करून बाधित झालेल्या शेळयांपासून चारा, पाणी इ. माध्यमातुन होतो.

लक्षणे :-

बाधित जांनावरांमध्ये उच्च् ताप, नाकातुन तसेच डोळयातुन चिकट स्राव किंवा पाणी वाहते,

तोंडातुन लाळ गळते, डोळे लाल होतात, हगवण होते.

खाणे पिणे अचानक बंद होऊन अस्वस्थ होते. घशाखाली गळ्याला सुज येऊन घोरल्यासारखा आवाज येतो.

श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो व खोकला येतो. • शेळया गाभण असतील तर गर्भपात होण्याची शक्यता असते.

उपचार :-

वेळीच/सुरवातीस उपचार केल्यास प्रतिसाद चांगला मिळतो. परंतु ७२ तासांपर्यंत उपचार न केल्यास मृत्यु होतो. रोगनिदानासाठी शेळया/मेंढयांच्या हृदयातील रक्ताचे व नाकातील खावाचे नमुने प्रयोगशाळेत प्ररिक्षणासाठी पाठवावे. शवविच्छेदनात सुईच्या टोकाच्या आकाराचे रक्तस्त्राव हृदयाचे,

फुप्फुसाचे बाहय आवरण, पोट व आतडयांवर दिसतात.

प्रतिबंधक उपाय :-

• कळपातुन बाधित जनावरे वेगळे करण्यात यावे.

• बाधित मृत शेळयांची योग्य विल्हेवाट लावावी. (जमिनीत पुरून किंवा जाळून)

• गोठे व आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, तसेच गोठ्यात जंतुनाशक फवारणी नियमितपणे करावी.

• साथीच्या रोगात शेळया/मेंढयांचे आठवडी बाजार बंद करावेत. तसेच नविन शेळया – मेंढयादेखील बाजारातुन आणु नये व आणल्यास पशूवैद्यकांच्या सहाय्याने निरोगी असल्याची खात्री करून घ्यावी.

लसिकरण :-

हा रोग साथीचा असल्याने ज्या भागात वारंवार या रोगाची साथ येते त्या भागात शेळी पालकांनी पावसाळयाच्या सुरवातीला रोगप्रतिबंधक लस टोचुन घेणे फायदयाचे ठरते.

फुऱ्या :-

फुऱ्या हा तीव्र स्वरुपाचा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग क्लॉस्ट्रीडीयम चोव्हॉय या जीवाणुमुळे होतो. सर्वसामान्यपणे या रोगामध्ये फऱ्याजवळ सुज येते त्यामुळे या रोगास फऱ्या असे म्हणतात. या रोगाचे जिवाणु मातीत वास्तव्य करतात. हे जिवाणु विष तयार करतात व रक्ताद्वारे हे विष शरीरात पसरून स्नायुमध्ये साठले जाते व जनावरांना या रोगाची लक्षणे दिसतात. हा रोग संसर्गिक असून, या रोगाचे जिवाणु संसर्ग झालेले खादय, पाणी, चारा व जखमा इ. माध्यमातुन निरोगी जनावरे वाधित
करतात.

लक्षणे :-

• या रोगात पायाच्या वरच्या भागात किंवा खांदयावर सुज येणे, पाय लंगडणे व त्या भागास दाबल्यास चरचर असा आवाज येतो.

• बाधित भागाची कातडी निळसर होते, गरम लागते, वेदना होतात व कांही दिवसांनंतर तो भाग वेदनाविरहीत होतो. जखम फुटल्यास त्यामधून काळसर द्रव बाहेर येतो व त्यात बुडबुड्या येणारा हायड्रोजन सल्फाईड वायु तयार होऊन त्यास खराब बास येतो.

• या रोगात उच्च् ताप असतो व जनावरांचे खाणे-पिणे थांबते.

रोगनिदान :-

बाहय लक्षणांवरून खात्रीपुर्वक निदान होऊ शकते. तसेच बाधित जनावरांच्या पायाचा मांसाचा

नमुना प्रयोगशाळेत पशुवैदयकाच्या सहाय्याने परिक्षणासाठी पाठवावा व रोगनिदान करून घ्यावे.

उपचार :-

पशुवैदयकाच्या सहाय्याने त्वरीत उपचार करून घ्यावा. सुरूवातीस उपचार केल्यास चांगला प्रतिसाद मिळतो, परंतु उपचारास विलंब झाल्यास मृत्यु होण्याची शक्यता जास्त असते. प्रतिबंधक उपाय :-

• आजारी शेळया निरोगी शेळ्यामधून वेगळया कराव्यात.

• मृत शेळयांची योग्य विल्हेवाट लावावी (जमिनीत पुरून किंवा जाळून).

• जानावरांना एकाच ठिकाणी वारंवार चरण्यास पाठवू नये.

लसिकरण :-

ज्या भागात वारंवार या रोगाची साथ येते त्या भागात शेळी पालकांनी पावसाळयाच्या सुरूवातीला रोगप्रतिबंधक लस टोचून घेणे फायदयाचे ठरते.

सांसर्गिक फुप्फुसदाह (सी.सी.पी.पी.) :-

हा रोग ज्या भागात जास्त पाऊस, कोंदत, दमट हवामान असते अशा भागात जास्त प्रामणात आढळतो. निकृष्ट गोठा व्यवस्थापन, शेळयांची रोगप्रतिकारशक्ती कमी असणे, सकस आहाराची कमतरता, अशक्तपणा तसेच वातावरणात आद्रता असेल तसेच जंताचा प्रादुर्भाव असेल तर शेळयांना या रोगाची लागण फार लवकर होते. लक्षणे :-

फुप्फुसाचा दाह होतो, शेळी खात नाही, अशक्त बनते, सारखा खोकला येतो, श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो. रोगाच्या सुरुवातीस शेळीच्या / करडांच्या नाकातुन पाणी येते. नंतर ते घट्ट होऊन नाकात शेंबुड येतो. बऱ्याच शेळयांना/करडांना हगवण लागते. प्रतिबंधात्मक उपाय :-

पावसाळ्यात थंड वातावरणापासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यात उष्णता घ्यावी. शेळयांना करडांना सकस आहार घ्यावा. शेळयांचे/करडांचे उत्तम व्यवस्थापन करावे. शेळयांचे जंतनिर्मुलन करावे. विषाणुजन्य आजार :-

नीलजिव्हा :-

हा रोग ऑरबीव्हायरस या विषाणुमुळे होणारा असंसर्गजन्य रोग आहे. या रोगाच्या

प्रसारासाठी क्युलीकॉईडस या रक्त पिणाऱ्या डासांच्या माध्यम म्हणुन वापर आवश्यक आहे. या

डासांच्या लाळ ग्रंथींमुळे हे विषाणु वाढतात आणि रोग प्रसार होतो. हा रोग प्रामुख्याने डासांची संख्या

वाढल्याने साधारणतः पावसाळयाच्या शेवटी व हिवाळ्याच्या सुरूवातीस होतो.

लक्षणे :-

रोगाच्या तीव्र स्वरुपात १०४ ते १०६०F इतका ताप ५ ते ७ दिवस असतो. बाधित शेळया- मेंढयांच्या नाकातुन स्त्राव येतो. डोळयातुन पाणी येते आणि तोंडातुन लाळ गळते. जीभ सुजून काळी निळी पडते, म्हणुनच या आजाराला ब्लूटंग किंवा नीलजिव्हा असे संबोधले जाते. जनावरांनाचे तोंड व दाढ सुजते तसेच खुरांवर सुज येते व कधी कधी खुरे वेगळी होतात आणि जनावरे लंगडतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो.

उपचार :-

हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे यावर विशिष्ट उपचार नाही. पशुवैदयकाच्या सल्ल्याने

प्रतिजैविके द्यावीत जेणेकरून दुयय्म जिवाणुजन्य संसर्ग उद्भवणार नाही. तोंडावर व पायावर झालेल्या जखमा निर्जंतुक पाण्याने धुऊन टाकाव्यात व त्यावर मलम लावावे.

प्रतिबंधात्मक उपाय :-

हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे त्यावरील उपचारापेक्षा प्रतिबंध महत्वाचा आहे. शेळयांना डासांचा प्रादुर्भाव असलेल्या भागात चरावयास पाठवू नये. साठलेल्या पाण्याची डबकी मुरूम टाकुन बुजवून घ्यावीत.

स्रोत : पुण्यश्लोक अचहल्यादेवी
महाराष्ट्र मेंढी व शेळी चवकास महामंडळ

लेखन व संकलन :- डॉ. सचिन टेकाडे, सहाय्यक संचालक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »