रेडगाव खुर्द येथील जि.प.शाळा झाली निपुण.
रेडगाव खुर्द येथील जि.प.शाळा झाली निपुण..
काजीसांगवी:-(उत्तम आवारे) रेडगाव ता.चांदवड येथे जि.प.ची इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत शाळा असून शाळेत 72 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वर्गवार अध्ययन निष्पत्ती मधील मुलांची संपादणूक कौतुकास्पद आहे.डिसेंबर 2023 मध्ये शाळा व्यवस्थापन समितीने पडताळणी करून ही शाळा निपुण जाहीर केली आहे.
निपुण भारत अभियान मिशन अंतर्गत शिक्षण क्षेत्रातील विकास हा कोणत्याही देशासाठी सर्वात महत्त्वाचा विकास आहे. शिक्षण क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण सुरू केले,ज्या अंतर्गत शिक्षण क्षेत्रात अनेक बदल करण्यात आले आहेत.नवीन शिक्षण धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारत सरकार विविध स्तरावर प्रयत्न करत आहे.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून भारत सरकारने निपुण भारत योजना सुरू केली असून विद्यार्थ्यांना शिकते करून ज्ञानी बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
भारत देशाच्या शिक्षण मंत्रालयाने 5 जुलै 2021 रोजी निपुण भारत योजना सुरू केली आहे. निपुण भारत मिशन (नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्युमरसी)या मिशनच्या माध्यमातून शैक्षणिक सक्षम वातावरण निर्माण केले जात आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचे ज्ञान दिले जाऊन प्रत्येक मुलाला सन 2026-27 पर्यंत इयत्ता 3 री च्या शेवटी वाचन, लेखन आणि अंकगणित शिकण्याची क्षमता प्रदान केली जाईल याची हमी देण्यात आली आहे.ही योजना शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत राबविण्यात येत आहे. निपुन भारत मिशन हा सर्वांगीण शिक्षणाचा एक भाग असेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 5 स्तरीय प्रणाली (राष्ट्रीय-राज्य-जिल्हा-ब्लॉक-शाळा) कार्यान्वित केली आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेत जि.प.शाळा रेडगाव खुर्द ता.चांदवड शाळेने पहिल्या दिवसापासून सक्रिय सहभाग नोंदविला आहे.मागील शैक्षणिक वर्षात दोन वर्ग व या शैक्षणिक वर्षात डिसेंबर 2023 मध्ये दोन वर्ग असे शाळेतील चारही वर्ग निपुण करून निपुण शाळा जाहीर केली आहे.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सयाजी ठाकरे, उपशिक्षक पी.डी कुवर, श्रीमती हेमा मुळणकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
SMC व क्षेत्रीय अधिकारी यांनी वेळोवेळी भेटी देऊन शैक्षणिक संपादणुकीचा आढावा व प्रत्याभरण दिल्यामुळेच हे शक्य झाले आहे. जिल्हा मुख्यालयापासून 70 कि.मी.अंतरावर ग्रामीण भागात हि शाळा असूनही शाळेने शैक्षणिक लोकसहभाग मिळवून संपूर्ण शाळा बालस्नेही व अध्ययनस्नेही बनविली आहे.
मुख्याध्यापक ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून गावातील अनेक तरुण विविध स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवत आहेत.