महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक: शेती,आशा,अंगणवाडी सेविका दिव्यांग कर्मचारी या बाबत मोठे निर्णय

0

आज दिनांक २३ जुलै २०२४ रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने मोठे निर्णय घेतले गेले.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येईल.

मेंढपाळांसाठी असलेली ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि लाभार्थीच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभार्थीना फायदा व्हावा म्हणून काही बदलासही मान्यता देण्यात आली आहे.

राज्य शासनातील दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गट ड ते गट अ च्या पदांच्या पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण लागू करण्यात येत आहे.

शेती नुकसान भरपाई अधिक पारदर्शकतेने व अचूकपणे देता यावी यासाठी पिकांचे नुकसान ठरविण्यासाठी अद्ययावत प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रणाली सुरु होईपर्यंत प्रचलित पद्धतीने नुकसान भरपाईची मदत देण्यात येईल.

बृहन्मुंबईमध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी माझगाव येथे ५१ सदनिका तीन वर्षाच्या कालावधीसाठी भाडेतत्वावर उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एका वर्षाच्या ७ कोटी ३४ लाख ४० हजार इतक्या भाडे खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील मौ. अंबड येथे एमआयडीसीला विस्तारीकरणासाठी १६ हेक्टर शासकीय जमीन विनामुल्य दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जमिनीची किंमत २४ कोटी २ लाख ४० हजार इतकी आहे.


राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या समाधानकारक झाल्या आहेत. याबाबतचे सादरीकरण कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत केले. राज्यात खरीपाचे ऊस वगळून १४२.२ लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत १२८.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर (९१ टक्के) पेरणी झाली असल्याची माहिती देण्यात आली.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »