बळिराजाचं टेंशन वाढलं! अवकाळी येऊन गेला पण कहर करून गेला, ‘ते’ पीक कसंबसं वाचवलं पण…
नाशिक : कांद्याची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्याची ओळख जगभरात आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत. मात्र यंदाच्या वर्षी लाल कांदा आणि उन्हाळ कांदा ही दोन्ही पिके अवकाळी पावसामुळे खराब झाली आहे. त्यात काही शेतकऱ्यांनी कसाबसा कांदा वाचवला मात्र आता तो कांदा साठवला तरी खराब होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. शेतात कांदा असताना त्याला काही प्रमाणात पावसाची पाणी लागले होते आणि त्यामुळे हा कांदा खराब होऊ लागला आहे. खरं तर शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा केल्यानंतर तो साठवण करण्यासाठी चाळी निर्माण केल्या आहेत. चाळीत कांदा साठवला तर तो अधिक काळ टिकतो मात्र, यंदाच्या वर्षी मोठा फटका बसू लागला आहे. साठवण करून काही दिवस होत नाही तोच कांदा खराब होत असल्याचे लक्षात येऊ लागले आहे.