टोमॅटो सुधारित रोपवाटिका तंत्र
हवामान
टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे, कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान चांगले मानवते. साधारणतः १८ अंश ते ३० अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते.
– तापमान ३८ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यास पिकाची शारीरिक क्रिया मंदावते व पेशींना इजा होते.
– तापमान जर १० अंश सेल्सिअसच्या खाली गेले तरी पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. पिकास इजा होते. उत्पादनात मोठी घट येते.
जास्त तापमान, कमी आर्द्रता आणि कोरडे वारे असतील तर फूलगळ होते. उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या हवामानात टोमॅटो फळाची गुणवत्ता ही चांगली असते, तर रंगदेखील आकर्षक येतो.
जमीन
– टोमॅटो हे पीक चांगला निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत उत्तम येते.
– हलक्या जमिनीत पीक लवकर निघते, तर भारी जमिनीत फळांचा तोडा उशिरा सुरू होतो; परंतु उत्पादन भरपूर निघते.
– जमिनीचा सामू हा ६ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
– क्षारयुक्त चोपण, पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत पिकांची वाढ खुंटते व फुलगळ होते.
– आधीच्या हंगामात टोमॅटोवर्गीय पिके म्हणजेच वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत. अन्यथा कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो.
– सूत्रकृमी (निमॅटोड) असणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये.
टोमॅटोच्या जाती
*भाग्यश्री – या जातीच्या फळांत लायकोपीन या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असून, बियांचे प्रमाण कमी आहे. फळे लाल गर्द रंगाची भरपूर गर असलेली प्रक्रिया उद्योगास चांगली आहेत. या जातीचे सरासरी उत्पादन ७५ ते ८० टन प्रति हेक्टर मिळते.
*धनश्री – फळे मध्यम गोल आकाराची नारंगी रंगाची असतात. या जातीचे सरासरी उत्पादन ८० ते ९० टन प्रति हेक्टर मिळते. ही जात टॉस्पोव्हायरस (टोमॅटोवरील ग्राउंटनट बड नेक्राॅसीस व्हायरस) आणि लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी प्रमाणात बळी पडते.
*राजश्री – फळे नारंगी लाल रंगाची असतात व या संकरित वाणाचे उत्पादन ८० ते ९० टन प्रति हेक्टर मिळते. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते.
*फुले राजा – फुले नारंगी लाल रंगाची असतात. ही संकरित जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते. उत्पादन ५५-६० टन प्रति हेक्टर मिळते.
रोपे तयार करणे
महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत टोमॅटोची लागवड यशस्विरीत्या केली जाते.
– एक हेक्टर क्षेत्रासाठी ३ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी. टोमॅटोच्या संकरित वाणांसाठी १२५ ग्रॅम बियाणे एक हेक्टर क्षेत्रासाठी पुरेसे असते.
– रोपवाटिकेची जमीन २ वेळा उभी-आडवी नांगरून व कुळवून घ्यावी.
– १ मी. x ३ मी. x १५ सें.मी. आकाराचे गादीवाफे तयार करावेत.
– गादी वाफ्यामध्ये ५ किलो कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९ः१९ः१९ किंवा १०० ग्रॅम १५ः१५ः१५ चांगले एकसारखे मिसळावे.
बीजप्रक्रिया
– थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रति किलो आणि त्यानंतर ॲझोटोबॅक्टर २.५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कुज हे रोग नियंत्रणात राहतात.
– यानंतर हाताने १० सें.मी. अंतरावर रेषा ओढून, त्यामध्ये १ सें.मी. अंतरावर एक एक बी पेरावे. झारीने हलकेच पाणी द्यावे. त्यानंतर गादीवाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत. साधारणपणे ५ ते ८ दिवसांत बी उगवते. बी उगवल्यावर आच्छादन काढून टाकावे.
– जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून द्यावीत. यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
– रोपे ४ ते ६ पानांवर आल्यावर म्हणजेच २५ ते ३० दिवसांनंतर उपटून त्यांची पुनर्लागवड करावी. रोपे काढण्यापूर्वी त्यांना आदल्या दिवशी पाणी द्यावे.
ट्रे पद्धत
रोपे निर्मितीसाठी ९८ कप्पे असलेला प्रो – ट्रे वापरावा. एक ट्रे भरण्यासाठी किमान १.२५ किलो कोकोपीट लागते. कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये एका कप्प्यात एक बी याप्रमाणे बी पेरावे. या पद्धतीत बियाणे वाया जात नाही. तसेच प्रत्येक रोपाची सशक्त वाढ होते. ट्रे पद्धत रोपांच्या वाहतुकीसाठी सोईस्कर आहे.
रोपवाटिकेतील पीक संरक्षण
– किडीच्या प्रतिबंधासाठी रोपवाटिकेत गादीवाफ्यात २५ ते ३० ग्रॅम फोरेट १२ दिवसांनंतर टाकावे.
– मर रोगाच्या नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझीम या बुरशीनाशकाची २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे आळवणी करावी.
लागवडीसाठी जमीन तयार करणे
एकाबाजूला रोप तयार होत असाना ज्या जमिनीत पुनर्लागवड करावयाची आहे, ती उभीआडवी खोलवर नांगरून व कुळवणी करून घ्यावी.
– २५ ते ३० टन प्रति हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे.
– जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्या, लव्हाळा गाठी वेचून जाळून टाकाव्यात.
—
krushinews.com

Khupnupukt mahiti