कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!कांद्याच्या बाजारभावात होणार वाढ

कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी येत आहे.बांगलादेश सरकारने गेल्या तीन महिन्यापासून घातलेली कांदा आयात बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे बांगलादेशात भारतातून निर्यात सुरू होणार असल्याने येणाऱ्या काळात कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याची शक्यता आहे.आता महाराष्ट्रातील विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा बांगलादेशला निर्यात करणे सोपे होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत आणि लासलगावमध्ये उन्हाळी कांद्याच्या भावात काही दिवसांपासून वाढ होतांना दिसून आली आहे.पाकिस्तान आणि बांग्लादेश येथील व्यापार बकरी ईद निमित्त बंद असल्यामुळे भारतीय बाजारपेठेतील कांद्याची मागणी वाढली आहे.जागतिक बाजारात कांद्याची मागणी वाढली असून याचा परिणाम म्हणून देशांतर्गत कांदा दरात सुधारणा झाली आहे. स्थानिक बाजारपेठेतील आवक, देशांतर्गत व निर्यातीसाठीच्या कांद्याच्या मागणीचा विचार करता याविषयीची भूमिका लवकरच स्पष्ट होणार असल्याचे दिसून येत आहे.पाकिस्तानात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली तर याचा परिणाम देशांतर्गत कांदा दरावर पाहायला मिळणार आहे.पाकिस्तानात जुलै महिन्यात कांद्याची निर्यात सुरु होणार असल्याने येणाऱ्या काळात कांद्याच्या भावात चढ उतार होणार असून भावात उचांकी बघायला मिळणार आहे. दरम्यान, स्थानिक बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून सरासरी ५० ते २००० रुपयांची वाढ दिसून आलेली आहे. तसेच लांबणीवर पडलेल्या पावसामुळेही कांद्याचे भाव वाढल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.येणाऱ्या काळात बांगलादेशमध्ये निर्यात वाढू शकते असे चित्र तयार झाले आहे.

पत्रकार -

Translate »