उत्तम आवारे चांदवड: नुकत्याच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या डोंगरी विभाग अंतर्गत येणाऱ्या गावांचा अधिकृत यादीत, सुतारखेडे गाव (तालुका-चांदवड जिल्हा नासिक) चा अपेक्षेप्रमाणे समावेश झालेला नाही, सुतारखेडे हे गाव सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरावर पूर्वीपासून बसलेले असून, भौगोलिकदृष्टया पूर्णपणे डोंगरी प्रदेशात येते. ऐतिहासिक पुराव्यानुसार, सुतारखेडे व कळमदरे ही एकच गाव होती. नंतर शासकीय कामकाजाच्या सोयीसाठी या गावाचे विभाजन करून दोन स्वतंत्र ग्रामपंचायती (सुतारखेडे व कळमदरे) निर्माण करण्यात आल्या. अलीकडे जाहीर झालेल्या डोंगरी विभाग यादीत कळमदरे गावाचा समावेश करण्यात आला असला तरी. त्याच जागी व त्याच भौगोलिक वैशिष्ट्यांवर वसलेल्या सुतारखेडे गावाला मात्र वगळण्यात आले आहे. हा निर्णय सुतारखेडे गावातील नागरिकांवर स्पष्ट अन्याय ठरतो. डोंगरावर वसलेले असल्याने सुतारखेडे गाव सतत दुष्काळग्रस्त म्हणून कुप्रसिध्द आहे, ज्यामुळे येथील मुलभूत विकास, शेती आणि आर्थिक उपजीविका गंभीररित्या खुंटलेली आहे. डोंगरी विभागात समावेश झाल्यास विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती/शिष्यवृत्ती मिळण्यास मदत होईल तसेच शेतकऱ्यांना डोंगरी भागासाठीच्या विशेष शेती योजना, पाणीसाठा, बियाणे अनुदान इत्यादींचा लाभ मिळेल तसेच गावाचे रस्ते, पाणीपुरवठा, वीज, यासारख्या मूलभूत सुविधांच्या विकासास प्राधान्य मिळेल.
हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुतारखेडे गावचे भूमिपुत्र तथा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गांगुर्डे यांनी आमदारांकडे याबाबत साकडे घातले आहे. सुतारखेडे गावाचे भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन व गावकऱ्यांच्या विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सुतारखेडे गावाला डोंगरी विभागात अधिसूचित करण्याची कृपा करावी व आपला योग्य निर्णय गावाच्या भवितव्यासाठी निर्णायक ठरेल ही अपेक्षा व्यक्ती केली.
