कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ उद्घाटन संपन्न.
उत्तम आवारे:देवळा येथील, कर्मवीर रामरावजी आहेर कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे मराठी विभागाच्या मराठी वाड्ःमय मंडळ उद्घघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे कवी श्री शिवराज पाटील यांनी ‘मराठी भाषा :एक प्रवाही भाषा’ या विषयावर मनोगत व्यक्त केले. सद्याची पिढी आई, वडील, कुटुंब, समाज यांचा विचार न करताच आपली जगण्याची रीत पाडत आहे. खरं जगण्याचं सोडुन काल्पनिक जगण्याला जोर देत आहे. आपल्या बरोबरच आपल्या आई-वडिलांचाही विचार केला पाहिजे. आई, बाप,कुटुंब, समाज,संस्कृती आणि गाव यांच्या अवती-भोवती श्री. पाटील यांची कविता घोळत राहते. त्याचबरोबर प्रभावी व्यक्तिमत्त्वावर, भाषा आणि राहणीमानाचा कसा प्रभाव पडतो, व्यक्तीमत्व विकासात संगत, सोबतीचाही महत्त्वाचा वाटा असतो. या आधुनिक कालखंडात वाचन संस्कार, सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची आहे. त्यासाठी आज जसे देशात मंदिरांना स्थान आहे. तसे वाचनालयाला सुध्दा स्थान असावे,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. साहित्य लिहितांना लेखकाने चौफेर निरिक्षण करावे, वाचन, मनन, चिंतन यानेच अस्सल साहित्य फुलत असतं. ‘काय लिहावे सुचत नाही, हल्ली कोणी वाचत नाही’, ‘डोईवर बानं माझ्या भार हुंड्याचा घेतला’ या कवितेतून सामाजिक संस्कार,चालीरीती, संस्कृती इत्यादींची मांडणी आहे. लेखकाने मनोरंजनाबरोबरच व्यवस्थेला, शासनाला प्रश्न विचारावेत. हीच खरी जबाबदारी आजच्या लेखकाची आहे. भाषा, भावना, संवेदनशीलता या सर्वांची आवश्यकता साहित्य निर्मिती करतांना असते. विद्यार्थ्यांने नेहमी नम्र असावे. आई,वडिल,गुरू यांच्या बरोबरच समाजातील इतर माणसही मोलाची असतात, त्यांचा आदर करावा, असे प्रतिपादन कवी श्री.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अतिथी परिचय प्रा.रवींद्र जे.पगार यांनी केले, तर आभार प्रा. संदिप वळवी यांनी व्यक्त केले.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर होते, उपप्राचार्य प्रो.डॉ.जयवंत भदाणे, सर्व विषय प्रमुख, सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




