कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) – त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा चांदवड तालुक्यातील पत्रकारांनी निषेध व्यक्त करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले.त्र्यंबकेश्वर येथे स्वामी समर्थ केंद्राजवळ पार्किंग वसुली करणाऱ्या गुंडांनी पत्रकारांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-महंतांची बैठक वृत्तांकनासाठी नाशिकहून गेलेल्या पत्रकारांना वारंवार आपण बातमी कव्हरेजसाठी आलो आहोत असे सांगूनही पार्किंग कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते. उलट पत्रकार वरिष्ठांना फोन करत असतानाच गुंडांनी मारहाण केली.
या हल्ल्यात पत्रकार योगेश खरे, किरण ताजणे, अभिजित सोनवणे यांच्यासह आणखी दोन पत्रकार गंभीर जखमी झाले असून नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पत्रकार संरक्षण कायदा २०१९ मध्ये झाला असला तरी सात वर्षांनंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्याने पत्रकारांवरील हल्ल्यांची पुनरावृत्ती होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. मुख्यमंत्री व शासनाने यात तातडीने लक्ष घालून हल्लेखोरांवर अद्दल घडेल अशी कारवाई करावी, तसेच संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याचे नोटिफिकेशन काढावे, अशी मागणी करण्यात आली.या निवेदनावर महेश गुजराथी, धनंजय पाटील, विकी गवळी, सुनील अण्णा सोनवणे, देवीदास जाधव, राम बोरसे, संजय जाधव, सोमनाथ जाधव, पिंटू राऊतआदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

