चांदवड तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागात गारपिटीमुळे शेतमालाचे मोठे नुकसान

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) – चांदवड तालुक्याच्या दक्षिण-पूर्व भागात आज दुपारी चार वाजेपासून जोरदार पावसासह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा बियाण्यासाठी लावलेले डोंगळे यामुळे खराब झाले असून, अनेक ठिकाणी डोंगळे काढणीस तयार होते.

काही भागांत शेतकरी कांदा काढून झाडाखाली उन्हापासून वाचवण्यासाठी ठेवला होता, पण अचानक पावसामुळे तो भिजला आहे. त्याशिवाय अर्ली जातीच्या द्राक्षबागांतील कोवळ्या शेंड्यांना मोठा फटका बसला असून, वर्षभर बाग सांभाळण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.

तसेच, काही ठिकाणी जनावरांसाठी चारा व मका साठवून ठेवण्यात आला होता, तोही पावसामुळे भिजला आहे. भाज्यांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीमुळे कांदा बियाण्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेतकऱ्यांनी शासनाकडे तत्काळ पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.

आज झालेल्या गारपीटीचा फटका मुख्यतः वाहेगावसाळ, काळखोडे, पाटे, कोलटेक, येडगाव खुर्द, पन्हाळे सोनी, सांगवी विकावे, काजी सांगवी, दिघवद, दहिवद, वडगाव पंगु, साळसाणे, वाकी, निंबाळे आदी गावांना बसला आहे.

Video :

पत्रकार -

Translate »